Advertisement

EVM विरोधात गळे काढण्याऐवजी आत्मचिंतन करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

‘ईव्हीएम’वर खापर फोडण्याऐवजी विरोधी पक्षांतील नेत्यांनी जनतेत जाऊन आपण कामं करण्यात कमी पडलो, हे आधी मान्य करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

EVM विरोधात गळे काढण्याऐवजी आत्मचिंतन करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
SHARES

‘ईव्हीएम’ (EVM)च्या जोरावर भाजपा सरकार निवडून आल्याचं म्हणत शुक्रवारी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सामूहीक पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आणि प्रामुख्याने निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतलं. या पत्रकार परिषदेत पुढील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी या परिषदेला उपस्थित सर्व नेत्यांनी केली. परंतु ‘ईव्हीएम’वर खापर फोडण्याऐवजी विरोधी पक्षांतील नेत्यांनी जनतेत जाऊन आपण कामं करण्यात कमी पडलो, हे आधी मान्य करावं. ‘ईव्हीएमवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे जनादेशावर शंका घेणं असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devindra Fadnvis) यांनी विरोधकांना लगावला.

‘या’ नेत्यांचा समावेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांच्या पुढाकाराने शुक्रवारी इव्हीएमचा विरोध करण्यासाठी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal), अजित पवार (Ajit Pawar), शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Pawar), शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty), आ.कपिल पाटील (Kapil Patil) आदी. नेते उपस्थित होते.

कोण काय म्हणालं?

या पत्रकार परिषदेत सर्वच नेत्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील प्रगत देशांमध्ये अजूनही बॅलेट पेपर (Ballot paper) च्या माध्यमातूनच निवडणुका होत असताना भारतात ईव्हीएम कशाला? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तसंच ईव्हीएमची चिप अमेरिकेतून भारतात आणली जात असल्याने त्यात कुठेही, कधीही फेरफार केला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघातील मतदारसंख्या आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान यांच्या आकडेवारीत फरक आढळले आहेत. तेव्हा सत्ताधाऱ्यांना असं वाटत असेल की जनतेचं त्यांच्यावर खूपच प्रेम आहे, तर त्यांनी हसतमुखाने बॅलेट पेपरवर आधारीत निवडणूक घेण्याची तयारी दाखवावी, असंही विरोधक म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा टोला

त्यावर ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. या मुद्यावर विरोधकांची एकजूट होऊन काहीही फरक पडणार नाही. ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी विरोधकांनी जनतेत जावं. आम्हाला कामं करता आली नाहीत, भविष्यात ती करू असं सांगितलं तरी जनतेकडून तुम्हाला सहानुभूती मिळेल. ईव्हीएममुळे भाजपा जिंकली किंवा ईव्हीएममध्ये घोळ आहे, असं म्हणत गळे काढणाऱ्यांना आणि याविरोधात एकवटणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. 



हेही वाचा-

'महाजनादेश' यात्रेला ‘शिवस्वराज्य’ यात्रेने उत्तर

ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटले, राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक सुरू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा