कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभर थैमान घालत असताना अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन आपण पोहोचलो आहोत. अशा स्थितीत आपण हातात वेळ असूनही उपायोजना केल्या नाहीत, तर भीषण परिस्थिती ओढावेल. राज्यात रविवारी कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. तरीही लोकं काही झालंच नाही, अशा अविर्भावात लोकं फेरफटका मारायला बाहेर निघत आहेत, त्यामुळे नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती राज्याचे उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सोमवारी संध्याकाळी दिली.
थाळ्या वाजवून कोरोना गेला नाही
मुख्यमंत्री पुढं म्हणाले, सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या. पण हे सगळं कोरोनाशी (COVID-19) मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी होतं. टाळ्या आणि थाळ्या वाजवल्याने कोरोनाला आपण घालवलं असा समज करून घेऊ नका.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/oSgBuNv9Ex
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 23, 2020
५ पेक्षा जास्त लोकं फिरू नका
कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रविवारी राज्यात १४४ कलम लावण्यात आलं. त्यानंतरही लाेकं आपल्याला काही होणार नाही, अशा अविर्भावात फेरफटका मारायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे मला नाईलाजाने राज्यात संचारबंदी लावावी लागत आहे. या संचारबंदीच्या काळात ५ पेक्षा जास्त लोकं घोळक्याने दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
वाहतुकीवर मर्यादा
सार्वजनिक वाहने तर बंदच आहेत. पण खाजगी वाहनेसुद्धा अत्यावश्यक कारणांसाठीच सुरु राहतील. रिक्षात एक ड्रायव्हर आणि एक प्रवासी आणि टॅक्सीत एक ड्रायव्हर आणि २ प्रवासीच असतील. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसंच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील.
रविवारीच आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करण्याची विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. त्यानुसार देशांतर्गत विमान वाहतूकही पूर्णपणे बंद होईल.
अंगणवाडीची मदत
याकाळात सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनसामुग्री असली, तरी वेळप्रसंगी मदत लागल्यास आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय प्रशिक्षण देऊन तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
सरकार सातत्याने करत असलेल्या विलगीकरणाच्या सूचना पाळा, स्वच्छता राखा आणि घराबाहेर पडू नका असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं.