मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मातोश्रीहून रवाना झाले आहेत. एकवीरा देवीच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्यातील जनतेच्या दृष्टीनं एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचं म्हटलं होतं. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसंच, कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार ते हा दौरा करीत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्या ठाकरे व मिलिंद नार्वेकर हा दौरा करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कधी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कदाचित याबाबतची वा जनतेच्या दृष्टीनं आणखी एखादी महत्त्वाची घोषणा उद्धव ठाकरे करणार का याकडंही सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा -
मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल
मुंबईत नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ