Advertisement

काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
SHARES

काँग्रेसच्या भांडुपमधील प्रभाग क्रमांक 116 मधील काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला कमलाकर पाटील यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंगळवारी रात्रीपर्यंत लोकांच्य भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतानाच अचानक त्यांच्या प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथे नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्या 56 वर्षांच्या होत्या. माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांची पत्नी तर माजी खासदार संजय पाटील यांची ती वहिनी होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

भांडुपमधील प्रभाग 116 मधून नुकत्याच झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रमिला पाटील यांनी विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता. प्रमिला पाटील यांच्या रुपाने काँग्रेसचा एक नगरसेवक भांडुपमधून निवडून आला होता. माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. सन 1997 आणि 2002 मध्ये सलग दोन वेळा कमलाकर पाटील हे निवडणून आले होते. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर प्रमिला पाटील यांनी सन 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 109 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु मनसेच्या वैष्णवी सरफरे यांच्याकडून त्यांचा अवघ्या 600 मतांनी पराभव झाला होता. परंतु 2017 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 116 मधून त्यांनी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. प्रमिला पाटील या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ‘एस’ प्रभागात महिला आणि बाल कल्याण समितीअंतर्गत योजनांची माहिती घेण्यासाठी बैठकीत व्यस्त होत्या. त्यानंतर त्या आपल्या विभागात लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरत असतानाच आठच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्वरीत फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल केले. परंतु तिथे नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रमिला पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपयांचे जकात चुकवून जाणारे ट्रक पकडून दिले होते. परंतु प्रशासनाने या जकात चोरांविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारला होता. प्रमिला पाटील यांनी खऱ्या अर्थाने पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांची भूमिका निभावत जकातचोरी पकडून दिला होता.

माथाडी कामगार नेते दिनाबामा पाटील आणि मनोरमा पाटील यांची मोठी सुन होती. दिनाबामा पाटील आणि त्यानंतर मनोरमा पाटील हे काँग्रेसमधून नगरसेवक झाले होते. परंतु त्यानंतर मनोरमा पाटील आणि संजय दिनापाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले तर कमलाकर पाटील हे काँग्रेसमध्येच राहिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा