मोदी सरकारच्या चिनी अॅपवरील बंदीच्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील इतर काँग्रेस नेतेही तिखट शब्दांत टीका करत असताना काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम (congress leader sanjay nirupam backs ban on chinese apps ) यांनी मात्र केंद्र सरकारच्या या भूमिकेचं समर्थन केलं आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून अडगळीत पडलेले निरूपम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
संजय निरूपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं आहे की, चिनी अॅपवरील बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय अगदी योग्य आहे. परंतु टिक टाॅक अॅपवर बंदी आल्यामुळे आपल्या देशातील लाखो तरूण बेरोजगार होतील. तसंच यामुळे सर्वात स्वस्त, शुद्ध आणि देशी मनोरंजनालाही आपल्याला मुकावं लागेल. टिक टाॅक स्टार्सचा अचानक झालेला हा अंत दु:खद आहे. त्यांच्या अमर्याद प्रतिभेला विनम्र श्रद्धांजली, असं म्हणत संजय निरूपम यांनी टिक टाॅक चा वापर करणाऱ्या लाखो तरूणांच्या भावनेलाही साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - Tiktok App: टिकटॉकने ‘पीएम केअर्स’ला दिलेले ३० कोटी हा क्रांतीचा भाग होता का? - सचिन सावंत
चीनी ऐप्स को बैन करना सही फैसला है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 30, 2020
पर टिक टॉक बैन होने से हमारे देश के लाखों नौजवान बेरोज़गार हो जाएँगे।
और इस दौर के सबसे सस्ते,शुद्ध और देसी मनोरंजन से हम महरूम हो जाएँगे।
टिक टॉक स्टारों का अचानक अंत त्रासद है।
उनकी असीम प्रतिभाओं को विनम्र श्रद्धांजलि #ChineseAppBlocked
त्याआधी काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चिनी अॅपवरील बंदीवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. १३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात असल्याचा दाखला देत भाजप सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारं, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारं आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारं NaMo अॅप देखील बंद केलं पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
तर, देश आता सुरक्षित हातांमध्ये आहे आणि भारताची डिजिटल सुरक्षा आता कोणीही ओलांडू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना उद्देशून म्हणजे ६ वर्षे देश असुरक्षित हाती होता का व डिजिटल असुरक्षा होती का? टिकटॉकने PMCARES ला ३० कोटी रुपये दिले तो क्रांतिचा भाग होता का? mygovindia TIKTOK वर २० दिवसांपूर्वी आणण्यावेळी डिजिटल सुरक्षा होती का? तसंच मोदींनी जाहिरात केलेल्या Paytm चं काय?, असे देखील प्रश्न सचिन सावंत यांनी विचारले.