शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईतील ग्रँड हयात हाॅटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी शेलक्या शब्दांत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (congress leader sanjay nirupam slams shiv sena mp sanjay raut over meeting with devendra fadnavis)
शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची बरीच भूक लागलेली दिसतेय. ही भूक बऱ्याचदा नेत्यांनाच खाऊन टाकते. ही दुर्भावना नव्हे, तर वास्तव आहे, अशी संजय निरूपम यांनी संजय राऊत यांचं नाव न घेताच टीका केली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवार २६ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात या हाॅटेलमध्ये भेट झाली. यानंतर या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल २ ते ३ तास चर्चा झाली. या गुप्त भेटीमुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात उलथा पालथ होणार का? शिवसेना-भाजप सत्तेसाठी पुन्हा जवळ येणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या. अखेर भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीमागचं कारण उघड करत चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - राऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण
ऐसा लगता है शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख लग गई है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 27, 2020
यही भूख अक्सर नेताओं को खा जाती है।
यह दुर्भावना नहीं, एक वास्तविकता है।#GrandHyatt
काही दिवसांपूर्वी सामना या वृत्तपत्रासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा संजय राऊत यांनी बोलून दाखवली होती. तर ही मुलाखत अनएडिटेड व्हावी, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. त्या मुलाखतीचं प्रारूप ठरवण्यासाठीच दोघांमध्ये ही भेट झाली. बिहार निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुलाखतीसाठी संजय राऊत यांना वेळ देतील. दोघांमध्ये झालेल्या भेटीमागे कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असा खुलासा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला. परंतु सत्ता वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला हाताशी धरून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्यातील मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. या दरम्यान संजय राऊत यांच्यासह इतर शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये कमालिचं वाकयुद्ध बघायला मिळालं. राज्यातील वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अद्यापही हमरीतुमरी पाहायला मिळते. अशी वातावरणात राऊत यांनी पहिल्यांदाच वेगळ्या कारणाने फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना पेव फुटला होता.