काही दिवसांपूर्वीच सुजय विखे-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपण अहमदनगरमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यांनंतर एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा मौन सोडलं. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. तसंच लोकसभेपेक्षा विधानसभेत मोठ्या घडामोडी घडतील असा दावा त्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षावर नाराज आहे. पक्षनेतृत्वानं ही स्थिती जाणून घ्यायला हवी. आपण पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तवही पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचं विखे म्हणाले.
आपल्या राजीनाम्यानं कोणतेही प्रश्न सुटणार नसून आपण भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी सुरू केली असल्याचा आरोप विखेंनी यावेळी केला. तसंच पक्षनेतृत्वाने आपल्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा असतानाही तसं झालं नाही. अनेक कार्यक्रम पूर्व नियोजित असतात. संयुक्त पत्रकार परिषद अचानक घेण्यात आली. त्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित राहणं शक्य झालं नाही. आपण नाराज नसून पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेसला आपल्या कार्यशैलीत बदल करणं आवश्यक आहे. तसं न झाल्यास त्याचा फटका लोकसभेपेक्षा विधानसभेत बसेल, असं विखे यावेळी म्हणाले. तसंच आघाडी न केल्यास पर्याय नाही, अशा भूमिकेत वावरणार असू तर पक्षातील कार्यकर्ते सक्षम होणार नाहीत. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षासाठी काम करत आहेत असं वाटत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. ज्यांच्याकडे क्षमता नाही, अशांना नेतृत्व देण्यात आलं, तर पक्ष कसा उभा राहिल, असा सवालही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच नाव न घेता केला. यापूर्वी काँग्रेसचा इतका दारूण पराभव झाला नसल्याचंही ते म्हणाले.
अहमदनगरमधील कार्यकर्त्यांची इच्छा भाजपबरोबर जाण्याची असल्याचा दावा विखेंनी मुलाखतीदरम्यान केला. आपल्या कुटुंबाबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रेम आहे. आता ही पक्षीय पातळीवरील निवडणूक राहिली नसून सुजय यांचा प्रचार करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. तसंच पक्षाकडून कारवाई झाली तरी चालेल अशी त्यांची मानसिकता असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बाजूनं उभा राहत नसल्यामुळं त्यांच्यात नाराजी असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -
युवासेनेची नाराजी दूर? पूनम महाजन यांनी घेतली आदित्य, उद्धव ठाकरेंची भेट
उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश