काँग्रेस सत्तेत आल्यास मुंबईत झोडपट्टीवासियांना ५०० चौरस फुटाचं घर देऊ, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. शुक्रवारी सायंकाळी वांद्रे येथील एमएमआरडीएच्या मैदानात राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला. चौकीदार फक्त चोरच नाही तर डरपोकही आहे, अशा शब्दात राहुल यांनी मोदी यांच्यावर टिका केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला. शुक्रवारपासून ते राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांची पहिली सभा धुळे येथे झाली. त्यानंतर सायंकाळी मुंबईत सभा झाली. यावेळी त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. मोदी यांनी शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. निवडणूक काळात दिलेलं एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही. १५ लाख किती लोकांना मिळाले असा सवाल करत २ कोटी रोजगाराचे काय झाले असाही सवाल राहुल यांनी उपस्थित केला.
मोदी हे संसदेत माझ्यासमोर बोलू शकत नाहीत. मिडिया समोरही ते बोलू शकत नाहीत. त्यांची बोलण्याची हिंमतच नाही. कारण चौकीदार चोरच नाही तर डरपोकही आहे, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर जहरी टीका केली. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केले. मोदी सरकारकडे अंबानींना कर्ज देण्यासाठी पैसा आहे. मात्र, शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. ललित मोदी, नीरव मोदी यांनाच पैसा दिला. ही सर्व मंडळी मोदीच कशी? असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -
अमोल कोल्हेंच्या हातावर आता घड्याळ्याची टिकटिक