सीबीआयचे संचालक अलोक शर्मा यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आणि सीबीआयच्या कामात सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत सीबीआय कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.
दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं सुरू असतानाच मुंबईतील बीकेसी इथंही शेकडो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बीकेसीतील सीबीआय कार्यालयापासून १० मिनिटांच्या अंतरावरील एमटीएनएल जंक्शनजवळ काँग्रेसकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नारेबाजीही करण्यात आली.
भाजपच्या भ्रष्टाचाराची विशेषकरून राफेल प्रकरणाची चौकशी होऊ नये याचा आटोकाट प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. त्यामुळेच सीबीआय प्रमुखांना रजेवर पाठवण्यात आलं आहे, असा आरोप करत काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जातं आहे. बीकेसीतील एमटीएनएल जंक्शनजवळ सकाळी ११ वाजता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम आणि माजी खासदार प्रिया दत्त यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
एमटीएनएल जंक्शन ते सीबीआय कार्यालय असा मोर्चा यावेळी काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला मध्येच रोखलं. पोलिसांनी निरूपम, प्रिया दत्त यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही वेळात सोडून दिलं. सीबीआय प्रमुख अलोक शर्मा यांना त्वरीत सुट्टीवरून परत बोलवावं आणि देशातील प्रमुख तपास यंत्रणेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवल्याबद्दल मोदींनी माफी मागावी अशी मागणी या निमित्ताने काँग्रेसकडून उचलून धरण्यात येत आहे.
हेही वाचा -
शिवस्मारक भूमिपूजनाचा घाट कशासाठी? - अजित पवार
'हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है'- स्मृती इराणी