पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत केलेल्या भाषणात 'भारतात हिंदू दहशतवाद पोसला जात आहे', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य इम्रान खान यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन केलं होतं, असा दावा करत पात्रा यांनी केला. त्यामुळं 'हिंदू दहशतवाद' या उल्लेखाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस पक्षानं देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली.
या पत्रकार परिषदेत पात्रा यांनी कॉग्रेसनं माफी मागावी अशी मागणी करत, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्र राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. एकही भ्रष्टाचार, घोटाळा नसलेले निष्कलंक सरकार अशी फडणवीस सरकारची ओळख आहे. महाराष्ट्राला देशातील एक क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत आहे. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे', असं म्हटलं.
'मागील ५-६ वर्षांपूर्वी शिक्षणामध्ये अकराव्या स्थानावर असणारा महाराष्ट्र आता तिसऱ्या स्थानावर आला आहे. दरदिवशी राज्याच्या विकासाचा एक तरी निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. याउलट आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याची स्पर्धा लागत असे', असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा -
विद्यापीठाची अर्धवार्षिक सिनेट नोव्हेंबरमध्ये?
सौरव गांगुली बनणार BCCIचा नवा अध्यक्ष?