कोरोनाविरोधातील (coronavirus) लढाई महत्त्वाच्या टप्प्यात आलेली असताना कोरोना संशयितांनी घरात लपून न बसता, स्वत:हून समोर यावं, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar, maharashtra) यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी जाहीर केलेला लाॅकडाऊन (lockdown) १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लाॅकडाऊनला संपायला ८ दिवस शिल्लक असताना राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. १२ तासांत देशात ४९० नवीन करोना रुग्ण आढळून आल्याने देशातील कोरोनाग्रस्तांचा (covid-19) आकडा ४ हजार ६७ इतका झाला आहे. तर राज्यात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ७४८ एवढी झाली आहे. त्यातील ४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ५६ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून ३१२२जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
हेही वाचा - आपण ज्ञानाचा दिवा लावूयात- शरद पवार
स्वत:हून पुढं या
यासंदर्भात भाष्य करताना अजित पवार (ajit pawar) म्हणाले, कोरोनविरुद्धच्या लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा सुरु झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे, परदेश प्रवासाचा इतिहास, कोरोना संशयित असणाऱ्या नागरिकांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. तर इतरांनी घरातच थांबावं, असं आवाहन पवार यांनी केलं.
#coronavirus चा प्रसार थांबविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणं, त्यासाठी नागरिकांनी घरात थांबणं, संशयितांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग. ही लढाई सर्वांची. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले, ही बाब बळ देणारी- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 6, 2020
साखळी तोडणं महत्त्वाचं
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवायचं असेल तर कोरोनाची साखळी तोडणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी नागरिकांनी घरात थांबलं पाहिजे. कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या संशयितांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच यातील प्रभावी मार्ग. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहे, हीच बाब बळ देणारी असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - ‘याला म्हणतात अकलेचे दिवे लावणं’, काँग्रेसची भाजपवर 'अशीही' टीका
बेजबाबदारपणाचा कळस
पंतप्रधानांच्या दिपप्रज्वलनाच्या आवाहनावर भाष्य करताना पवार म्हणाले, पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही काही जण मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरले होते, तर काही जणांनी फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरण्यासारखे प्रकार केले. हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.