मागील २ दिवसांमध्ये मुंबई पोलीस दलातील २ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माणूस गेल्यावर त्याची उणीव भरून काढता येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं.
107 पोलीस कोरोनाबाधित
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून पोलीस अधिकारी-कर्मचारी २४ तास ठिकठिकाणी कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना २० अधिकारी, ८७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३ पोलीस अधिकारी व ४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असले, तरी दुर्दैवाने २ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
हेही वाचा- सध्या तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा प्रश्न केला जातो. परंतु, आज याच पोलिसांकडून दिवसरात्र सेवा. दुर्दैवाने दोन पोलिसांचा #कोरोना मुळे मृत्यू. शासन पोलिसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे. त्यांना सर्व मदत देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 26, 2020
पोलीस काय करत होते?
मागील २ दिवसांत पोलीस दलातील दोघा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना सरकारच्या वतीने आदरांजली. सध्याच्या घडीला प्रत्येकजण संयमाची परीक्षा देत आहे. अशा स्थितीत पटकन एखादी गोष्ट घडते आणि सगळेजण म्हणतात की पोलीस काय करत होते? सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांवर कारवाई करा, पोलिसांचा रिपोर्ट मागवा,अशा मागण्या केल्या जातात. जिथं जिथं ज्या गोष्टी असतील, तिथं त्याप्रमाणे होणार.
परिस्थितीचा विचार करा
पण आपण सुद्ध हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं घर, दार, कुटुंब सोडून हे पोलीस आपलं कर्तव्य करताहेत आणि आज कोरोनाशी लढताना शहीद झालेले आहेत. सरकारच्या वतीने या पोलिसांच्या कुटुंबासाठी जे काही करता येणं शक्य आहे, त्यापलिकडे जाऊन आपण ते करणार आहोतच, पण माणूस तर गेला आहे. त्यामुळे कोणावरही पटकन संशय व्यक्त करण्याआधी आपण त्या त्या वेळच्या परिस्थितीचाही विचार केला पाहिजे. कारण हे सगळेजण आपल्यासाठी अत्यंत तणावाखाली मेहनत करत आहेत.