कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी २८ मार्च २०२० पासून शिवभोजन थाळी (Shiv bhojan thali) प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत होतं. लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करुन शिवभोजन थाळीची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food and civil supply minister chhagan bhujbal) यांनी दिली आहे.
तालुकास्तरावर विस्तार
राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर (taluka level) विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या (lockdown) काळात२ मे पर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरु राहणार आहे.
#Lockdown मध्ये रेशन धान्य वाटप करताना अनियमितता, नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे, ८७ रेशनदुकानांचे निलंबन तर ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द. शिवभोजन थाळींची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय - अन्न, नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती pic.twitter.com/JFTqdLVapE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2020
भुकेल्यांना दिलासा
या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसंच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.