राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन (lockdown) असल्याने जनतेला अनेक गैरसोईंना सामोरं जावं लागत आहे. अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असला, तरी तो मर्यादीत प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. परिणामी या वस्तू मिळवताना जनतेचे हाल होत आहेत. जनतेचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने धान्याऐवजी थेट पीठ देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (state revenue minister balasaheb thorat) यांनी दिली.
हेही वाचा- चिंता नको, २ रुपये किलो दराने गहू, तर ३ रुपयांना तांदूळ मिळणार!
बजेट कोलमडलं
कोराेनाचा (COVID-19) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने अत्यावश्यक (essential goods) सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार यांच्यासोबत शेतकरी असे समाजातील सर्व घटक सध्या घरात अडकून पडले आहेत. उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाण-घेवाण थांबली आहे. बहुतांश लोकांकडे तर खर्च करण्यासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे.
स्वस्त दराने धान्य
त्यामुळे भाजीपाला येताच बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. गॅस सिलिंडरपासून ते इतर अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहे. देशातील ८० कोटी जनतेला दिलासा देण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा मोठा निर्णय बुधवारी केंद्राच्या कॅबिनेटने घेतला. याला पूरक म्हणून धान्याऐवजी थेट पीठ देण्याचा विचार सरकार करत आहे.
संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरू आहे.#WarAgainstVirus#StayHomeStaySafe
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 26, 2020
शेतीची कामे सुरू
यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरू आहे.
हेही वाचा- मोदीजी ‘त्या’ ‘जन धन’ खात्यात ६ हजारांचं ‘धन’ टाका, मनसेची पंतप्रधानांकडे मागणी
शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन आणण्यात आले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल. तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनला इंधन दिलं जाईल.
तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.