दादर - 'मुंबई लाइव्ह'च्या मुंबई नाका या कार्यक्रमामुळे ज्ञानाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मत राजकारण्यांसह तज्ज्ञांनी व्यक्त केलं. 'मुंबई लाइव्ह'च्या मुंबई नाका या कार्यक्रमात शिवसेना नगरसेवक अवकाश जाधव, काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे, भाजपा प्रवक्ता निरंजन शेट्टी, पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र फातर्फेकर आणि जेष्ठ रंगकर्मी अजित भुरे इत्यादी मान्यवरांनी 'पर्यावरण' या विषयावर आपली मते मांडली.
भाजपा-शिवसेनेने एका तासांत 56 प्रस्ताव पास केले आणि शेकडो झाडांची कत्तल केली त्यावेळी त्यांना पर्यावरणाचा विसर पडला का? असा सवाल करत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच हे 6 झाडं लावू शकत नाहीत तर 16 हजार झाडं काय लावणार असा खोचक टोलाही त्यांनी भाजपा प्रवक्ता आणि वृक्ष प्राधिकरण सदस्य निरंजन शेट्टी यांना लगावला. जर सीसीटीव्ही लावले असते तर किरीट सोमय्या यांनी 150 रुपयांचा टँकर 700 रुपयाला विकला नसता असं सांगत भाजपावर शरसंधान साधले.
'राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्री अशी अनेक मंत्रीपदे हवी असतात पण पर्यावरण मंत्रीपद हवं असं कुणीच बोलताना दिसत नाहीत' असं अजित भुरे यांनी सांगितलं. या चर्चेत पर्यावरण तज्ञ्ज राजेंद्र फातर्फेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून पर्यावरण नष्ट होतेय आणि कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब असल्याचे सांगत मुंबईच्या समुद्राला मारून टाकल्याची खंत देखील व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी 'मुंबई लाइव्ह'ने सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना निवडून आल्यानंतर पर्यावरणाबाबत तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला. त्यावेळी जवळपास सगळ्यांनी झांडांची संख्या वाढवू, पर्यावरणाबाबत जनजागृती करू, मुंबईकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी देऊ, डम्पिंग ग्राऊंडचा विषय निकाली काढू अशी आश्वासनं दिली.