Advertisement

राजकारण नेत्यांचे ,फरफट दलित बांधवांची


राजकारण नेत्यांचे ,फरफट दलित बांधवांची
SHARES

मुंबई - दलित बांधवांना एकत्र आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. पण या पक्षाचीच आता शकलं पडली आहेत. या शकलं पडलेल्या सर्व रिपाइंच्या गटांना एकत्र आणून त्यांचे महाऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही रिपाइं पक्षाचे नेते गटातटात विभागले गेले असून याही महापालिका निवडणुकीत रिपाइंच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत घरोबा केलाय. त्यामुळे दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांच्या राजकारणामुळे दलित बांधवांची फरफट होत असून ते कोणा्च्या बाजूने आपला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असणाऱ्या रिपाइं (आठवले ) गटाने मागील महापालिका निवडणुकीत शिवशक्ती व भीमशक्तीचा नारा देत शिवसेनेची साथ दिली. पण आता याच रिपाइं (आठवले ) गटाने यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपची साथ पकडली आहे. या रिपाइंला भाजपाने १९ जग सोडल्या आहेत. त्यामुळे या जागांवर रिपाइंने आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत.
त्यामुळे काँग्रेसने विधान परिषदेवर प्रोफेसर जोगेंद्र कवाडे यांना निवडून दिल्याने पिपल्स रिपब्लिकन पार्टी हि काँग्रेससोबतच आहे. पीपल्सने मुंबईत सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत..

शिवसेना- भाजपा युती तुटल्यामुळे रामदास आठवले हे भाजपासोबत गेल्यानंतर साहित्यिक व रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे हे शिवसेनेसोबतच राहिले. राष्ट्रवादी पक्षाला गरज भासत असल्याने पुण्यामधून आरपीआयने (खरात गट) राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. आरपीआय (गवई गट) चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई काँग्रेस व इतर पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांची डाळ काही शिजली नाही. त्यामुळे त्यांची युती काँग्रेससोबत अमरावतीमध्ये होऊ शकली, मात्र मुंबईमध्ये होऊ शकली नाही.

प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय बहुजन पक्षाने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र त्यांचे बंधू आंनदराज आंबेडकर यांनी यावेळी मायावतींच्या बहुजन समाज पक्षासोबत युती केली आहे. त्यामुळे दलित नेत्यांच्या वेगवेगळ्या पक्षांशी घरोब्यामुळे मतदान करायचे तर कोणाला हाच प्रश्न दलित बांधवांना पडला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा