काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केवळ घराणेशाही जपली. या घराणेशाहीतून फक्त दोन्ही पक्षांतील मुलगा, मुलगी, पुतण्या यांचंच भलं झालं. त्यामुळे ज्यांना राज्याच्या विकासात योगदान द्यायचं आहे, अशाच नेत्यांना भाजपात संधी देण्यात येत आहे. भाजपाने अजून आपले दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत. हे दरवाजे पूर्ण उघडल्यास विरोधी पक्षांत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर झाला. यावेळी भाजपाकडून काही नेत्यांना प्रवेश देखील देण्यात आले. यामध्ये कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक, माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे नेते राणा जगजीतसिंह यांचा समावेश होता. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित हाेते.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप तसंच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी वाढत चालली आहे. यामागची कारणं तपासून राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. हे दोघेही फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत आहेत. परंतु फडणवीस मागील ५ वर्षांत केलेल्या कामाचा जनतेला हिशेब देण्यासाठी ही यात्रा करत आहेत. हिंमत असेल तर शरद पवार यांनी इतकी वर्षे केलेल्या कारभाराचा हिशेब द्यावा’, असं आव्हान शहा यांनी पवार यांना दिलं.
हेही वाचा-अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले
भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?