लोकसभा निवडणूक संपत नाही तोच सर्व न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचे निकाल सुरू झाले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून काँग्रेसची १०० चा आकडा गाठताना दमछाक होताना दिसत आहे. भाजपा आपल्या सहकारी पक्षांसोबत पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकते.
महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना युतीचंच वर्चस्व राहील असे एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यापैकी युतीला ३६ ते ३८ जागा मिळतील, असं म्हटलं जात आहे. २०१९ मध्ये भाजपा २५ जागा लढत असून शिवसेना २३ जागा लढत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १० ते १२ मिळतील असा अंदाज आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने २५ पैकी २४, तर शिवसेनेने २३ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या.
राज्यात युती आणि महाआघाडी वगळता इतर कुठल्याही पक्षाला जागा मिळताना दिसत नाही. राज्यात युती आणि महाआघाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने आव्हान दिलं होतं. परंतु एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात या दोन्ही पक्षांचं खातं खुलताना दिसत नाही. २०१४ मध्ये काँग्रेसने २६ जागा लढवताना २ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादीने २१ जागा लढवून त्यांच्या पारड्यात केवळ ४ जागा आल्या होत्या.
राज्यात पुढील काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपा-शिवसेनेने राज्यात लोकसभेच्या ४० हून जागा जिंकल्या, तर हा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असेल. राज्यात बहुतेक पक्षांनी विधानसभेच्या तयारीसाठी रणनिती आखायला सुरूवात केली आहे.
हेही वाचा-
एक्झिट पोल इफेक्ट, सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला
मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ