कर्जमाफी आणि सातबारा नावावर करून देण्यासारख्या अन्य मागण्यासाठी अखेर शेतकरी-आदिवासी बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आपल्या न्यायहक्कासाठी राज्याच्या विविध भागातील हजारो शेतकरी गुरुवारी मुंबईत धडकणार आहेत.
शेतकरी- आदिवासीच्या या मोर्चाला सुरुवात झाली असून मंगळवारी ३००० हुन अधिक शेतकरी- आदिवासी बांधव मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. ठाण्याच्या जकात नाक्यावर रात्रभर विश्रांती घेत शेतकऱ्यांचा हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दुपारी हा मोर्चा सोमय्या मैदानावर पोहचणार आहे. तर गुरुवारी सकाळी मोर्चेकरी आझाद मैदानावर धडकणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध १२ मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मार्चमध्ये विराट मोर्चा काढला होता. त्यावेळी हजारोंच्या संख्येनं लाल वादळ मुंबईत धडकलं होतं. या मोर्चाची दखल घेत सरकारने आश्वासन दिली खरी, पण ही आश्वासनं आश्वासनंच राहिली आहेत. त्यामुळे सरकारने आपल्या तोंडाला पानं पुसली असं म्हणत शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आपल्या मागण्यांची आणि सरकारच्या आश्वासनाची आठवण सरकारला करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार अशा विविध जिल्ह्यातील शेतकरी- आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाण्यात दाखल झाला आहे. ठाणे ते विधानसभा असा हा मोर्चा असणार आहे.
सध्या ठाण्याच्या जकात नाक्यावर ३००० हुन अधिक शेतकरी जमा झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे. आता काही वेळातच हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघणार असून दुपारी हा मोर्चा सायनच्या सोमय्या मैदानावर पोहचणार आहेत. इथं विश्रांती घेत गुरुवारी सकाळी मोर्चेकरी आझाद मैदानावर पोहचतील. इथं त्यांचं सरकार विरोधात जोरदार आंदोलन होणार असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा -