सध्या विरोधी पक्षापेक्षा सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनेच सरकारविरोधात वेळोवेळी अाक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले अाहे. अाज मंत्रिमंडळ बैठकीतही त्याची झलक पाहायला मिळाली. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे खापर अाघाडी सरकार व युती सरकार एकमेकांच्या डोक्यावर फोडत असतानाच शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र विद्यमान सरकारलाच धारेवर धरलं. धर्मा पाटीलप्रकरणी युती सरकारची बदनामी झाली असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी रावतेंनी केली.
सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. मी कालपासून ऐकत आहे की, हे प्रकरण आधीच्या सरकारचे पाप आहे. पण फडणवीस साहेब, माझा तुम्हाला एकच सवाल आहे की, आधीच्यांनी शेण खाल्लं म्हणून त्यांना बाजूला सारून लोकांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं. पण, गेल्या ३ वर्षात आपण काय केलं?, अशा सवाल करत शिवसेनेच्या दिवाकर रावते यांची भाजपची पुरती कोंडी केली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी रावते यांची मागणी मान्य केली.
दुसरीकडे सामना वृत्तपत्रामधून सरकारवर झालेल्या जहरी टीकेला भाजपच्या सुधीर मुनगंटीवर यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. शिवसेना भाजपसोबत सत्तेत अाहे. त्यामुळे भाजप मंत्र्यांच्या खुर्च्या जळून खाक होणार असतील तर त्यासोबत सेनेच्याही होतील, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला.