गोरेगाव - महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी प्रभाग क्रमांक 56 मधील इव्हीएम मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या विरोधात गोरेगाव येथे प्रभाग क्र 56 मधील 14 उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मशिनची अंत्ययात्रा काढून निर्दशने केली. तसेच यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काय करता येईल यावर उपाय सुचवणारे पत्र देखील पी दक्षिण विभागाचे आयुक्त संतोष कुमार धोंडे यांना दिले. तसेच भाजपाच्या नगरसेविका राजुल देसाई यांचे पती समीर देसाई यांनी आचारसहिंतेच्या काळात जनतेला डब्यातून पैसे वाटले, हळदी कुंकू समारंभ साजरा केला, त्याचप्रमाणे उमेदवारी अर्जात संपत्ती खोटी दाखवली अशी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना केली होती. तरीही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही. त्यामुळे अशा भ्रष्ट्र अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांनी केली. याबाबत लवकरच कारवाई केली जाईल असे महापालिका आयुक्तांनी आश्वासन उपस्थित शिवसेना, अपक्ष, आरपीआय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दिले.