लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील ८ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी नीती आयोगानं येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केलं.
A task force has been set up to manage distribution and vaccination in Maharashtra and the government is in constant touch with Adar Poonawalla of the Serum Institute of India to track development of the coronavirus vaccine. pic.twitter.com/DJfGKAfsJJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 24, 2020
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसंच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल. तर अधिक नियोजनबद्ध रीतीनं हा लढा देता येईल.
कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी महाराष्ट्र सरकारचं बोलणं सुरू आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला आहे. त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४ हजार ७०० ते ५ हजार रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येत घसरण झाली आहे. आठ राज्याच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दिल्ली इथं दररोजच्या रुग्ण संख्येत १०० टक्के वाढ आहे. हरियाना ५३ टक्के, पश्चिम बंगाल ८ टक्के वाढ आहे. या तुलनेत गुजरातमध्ये १४ टक्के घट, केरळ २८ टक्के, छतीसगड ५० टक्के, महाराष्ट्र ७६ टक्के अशी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र मृत्यू दर अजूनही महाराष्ट्रात सर्वात जास्त २,४४, पश्चिम बंगाल १.७५ दिल्लीत १.२२, छतीसगड १.१५ असा आहे.
हेही वाचा