मुंबई - मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना - भाजपा युतीची बोलणी पुढे सरकत असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यास विलंब होत आहे. मात्र, दुसरीकडे आघाडीसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसला टाळी द्यायला काँग्रेस पक्ष असतानाही त्यांनी उमेदवार जाहीर केले.
समाजवादी पक्षानेही उमेदवारांची आपली दुसरी यादीही जाहीर केली. परंतु युती आणि आघाडी करण्यासाठी टाळी देण्यास कोणी पुढे येत नसतानाही मनसेकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात नाहीत. त्यामुळे मनसे कुणाच्या टाळीची वाट पाहतेय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मागील निवडणुकीत मनसेने इच्छुक उमेदवाराची लेखी परीक्षा घेऊन उमेद्वारी दिली होती. परंतु यंदा मनसेचा करिष्माच संपत चालल्यामुळे पक्षातील प्रकाश दरेकर, सुरेश आवळे, ईश्वर तायडे , गीता चव्हाण, सुखदा पवार आदी नगसेवकांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे विद्यमान नगसेवकांना तिकीट देऊन कामाला लागण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या. पण, मनसे हा पक्ष आजवर स्वतंत्र निवडणूक लढवत असतानाही त्यांच्याकडून किमान विद्यमान नगरसेवकांची नावे जाहीर केली जात नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाची आघाडी होण्याची शक्यता असतानाही या दोन्ही पक्षांच्या उमेदवाराच्या याद्या जाहीर झाल्या. पण मनसेला मात्र अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करता आलेली नाहीत. त्यामुळे मनसेला पदाधिकारी पक्ष सोडून जाण्याची भीती आहे कि कोणी टाळी देते का याची ते वाट पाहत आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
राजकीय जाणकारांच्या मते मनसेला कार्यकर्ते व पदाधिकारी पक्ष सोडून जाण्याची भीती आहे. म्हणून ते शिवसेना आणि भाजपच्या उमेदवार यादीची वाट पाहत आहेत, त्यांची यादी प्रसिद्धी झाली कि मनसे आपली यादी जाहीर करेल असं त्यांचं म्हणणं आहे.