कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेत घोळ झाल्याचं खापर फोडतमाहिती व तंत्रज्ञान विभागा(आयटी) चे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांची अखेर उचलबांगडीकरण्यात आली. त्यांच्या जागी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची आयटी विभागाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर गौतम यांच्याकडे वित्त विभागाचं (लेखा व कोषागारे) प्रधान सचिवपद सोपवण्यात आलं आहे.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळामुळे सरकारची चांगलीच गोची झाली होती. त्यामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्या डोक्यावर आयटी विभागाच्या घोळाचं खापर फोडत काही दिवसांपूर्वीच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
त्यानंतर आता त्यांची बदली केल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. पण तरीही वारंवार तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.