गावोगावच्या ग्रामपंचायतीत 'आपले सरकार' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देणारे संगणक परिचालक सोमवारी आपल्या विविध माागण्यांसाठी मुंबईत धडकणार आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून संगणक परिचालक (कम्प्युटर ऑपरेटर) विनामोबदला काम करत आहेत. त्यामुळे शासनाने येत्या अर्थसंकल्पात मानधनाबाबत ठोस तरतूद करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राणीबाग (भायखळा) ते आझाद मैदान (सीएसटी) मार्गावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.
'आपले सरकार'च्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचं काम संगणक परिचालक करत आहेत. या परिचालकांच्या उत्कृष्ट कामांमुळे राज्य शासनाला ई- पंचायतमध्ये सलग ३ वर्षे देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळला आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करण्याचे काम तसेच गावातच विविध प्रकारचे दाखले परिचालक उपलब्ध करुन देत असतात. परंतु, या संगणक परिचालकांना गेल्या ८ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. १४ व्या वित्त आयोगाचा निधी विकासकामासाठी अाहे, त्यातून आपले सरकार सेवा केंद्रासाठी निधी देणार नाही, अशी राज्यातल्या ग्रामपंचायतीनी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे या परिचालकांना मानधन मिळत नाही. म्हणून १४ व्या वित्त आयोगा ऐवजी राज्याच्या अर्थसंकल्पात मानधनाची ठोस तरतूद करावी, तसेच संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना 'आपले सरकार'मध्ये सामावून घ्यावं, अशी या परिचालकांची मागणी आहे.
मार्चमध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर संगणक परिचालकांनी मोर्चा नेला होता. त्यावेळी ८ दिवस ठिय्या आंदोलनही केलं होतं. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकाला 'आपले सरकार' सेवा केंद्रात सामावून घेण्यात येईल, निश्चित मानधन देण्यात येईल व ते वेळेवर देण्यात येईल असे आश्वासन दिलं होतं.
परंतु या आश्वासनाची शासनाने पूर्तता केली नाही, त्यामुळे परिचालकांना पुन्हा मोर्चा काढावा लागत असल्याचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे म्हणणं आहे. आझाद मैदान येथे न थांबता मोर्चा थेट विधानभवनावर नेण्याचा निर्णय परिचालकांच्या संघटनेने घेतला आहे, तसंच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही, असाही या संघटनेचा पवित्रा आहे.