Advertisement

राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचं आकर्षण आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचं आकर्षण आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी व्यक्त केला. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत उद्योजकांची भेट घेणार आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आहे. 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळं राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे इथं येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून इथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही.

महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावं, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा- महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत

कोविडचे (coronavirus) संकट अजूनही संपलेलं नाही. पण या संकटातही पुढे कसं जायचे याचा आपण मार्ग शोधतो आहोत. चेंबरशी संलग्न आपण सर्व हे महाराष्ट्राच्या परिवाराचा भाग आहात. त्यामुळे परिवारातील आपल्या दोघांचंही उद्द‍िष्ट एक आहे. यातून आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे.

अडचणीचा काळ सुरु आहे. पण या काळात नोटबंदीत जसा पैसा गायब झाला, तसा गायब झाला नाही. आता चक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने पुढे जाऊया. त्यासाठी आम्ही ईझ ऑफ डुईंग बिझनेस सारख्या संकल्पना राबवित आहोत. त्यामध्ये तुम्हा उद्योजकांकडून आणखी सूचना याव्यात. नवीन काही करू शकतो का, त्याबाबत संकल्पना मांडण्यात याव्यात.

परवाना पद्धती सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी पद्धतीही राबवित आहोत. दरम्यानच्या काळात आपण ६० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. जूनमध्ये झालेल्या या करारांनुसार संबंधित उद्योजकांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी लक्ष घातलं जात आहे. यातून महाराष्ट्रात एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास आहे. त्यासाठी आपण एकत्रित काम करताना मिशन एंगेज महाराष्ट्र हे अभियान उपयुक्त ठरेल. या अभियानातून तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा म्हणूनही काम करता येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देशातील आणि जगातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात या असे सांगता येईल. गुंतवणूक, उद्योग यांच्यासोबतच आपल्याला रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यावा भर द्यावा लागेल. सामान्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटला, तरच होणाऱ्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ, खरेदीदार मिळू शकेल. यासाठी आपण महाजॉब्ज पोर्टलची व्यवस्था केली आहे. यातून जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम मिळेल असे प्रयत्न करू. अशा अडचणीच्या काळातही महाराष्ट्राकडून जगापुढे आगळा आदर्श ठेवला जाईल. यात तुमच्या सोबत सरकार पूर्ण ताकदीने राहील. महाराष्ट्र बलवान आहेच. त्याला आपण एकत्र येऊन आणखी बलवान करूया, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

(maharashtra cm uddhav thackeray appeals businessmen and indian merchants chamber of commerce to invest in state)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा