Advertisement

‘अशी’ मां कसम सर्वांनी घ्यावी- उद्धव ठाकरे

कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. कोरोनावर लस उपलब्ध होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे.

‘अशी’ मां कसम सर्वांनी घ्यावी- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. कोरोनावर लस उपलब्ध होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केलं. (maharashtra cm uddhav thackeray speaks on covid 19 pandemic and importance of face mask)

जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्यमंत्री  राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले. तसंच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही. पण कोरोनाची दुसरी लाट न येऊ देणं यासाठी दक्ष राहिलंच पाहिजे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन ४ जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? शरद पवारांनी सांगितलं कारण…

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेलं काम कौतुकास्पद आहे. याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करावा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे १ ते २ लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे याप्रसंगी म्हणाले.  

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविलेल्या मोहिमेमुळे  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या २४ तासात एकाही मृत्यूची नोंद नाही, हेदेखील त्यामुळेच शक्य झालं, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.

आज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या माझ्या मतदारसंघात आता आकडा शून्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे, असं सांगून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच या प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरदेखील एक टक्क्यांच्या खाली नेऊ असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचं राजकीय स्वास्थ्य जपणारा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा