औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्यासाठी लवकरात लवकरात अधिसूचना काढावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.
हेही वाचा- संभाजीराजेंच्या नावाची अॅलर्जी असेल तर सांगा- चंद्रकांत पाटील
औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यावरून राजकारण तापलेलं असतानाच येथील विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याने आगीत तेल ओतलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबदच्या नामबदलाला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने (congress) आधीच कडाडून विरोध केलेला आहे. तर नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली आहे.
त्यातच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना पत्र लिहिल्याने महाविकास आघाडीतील धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. त्यावर तिन्ही पक्षातील नेत्यांकडून परस्पर विधाने केली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून देखील या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना महापालिकेतील सत्ता आमच्या हाती द्या आम्ही दुसऱ्याच दिवशी शहराच्या नामबदलाचा प्रस्ताव पारित करतो, असं आवाहन भाजपने मतदारांना केलं आहे.