Advertisement

जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर

मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत राज्यपालांना उत्तर दिलं आहे. शिवाय माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हणत टोलाही लगावला आहे.

जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर
SHARES

राज्यातील मंदिर खुली करण्यावरून सध्या भाजप आंदोलन करत आहे. त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देत मंदिरं खुली करण्याविषयी विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत राज्यपालांना उत्तर दिलं आहे. शिवाय माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हणत टोलाही लगावला आहे. (maharashtra cm uddhav thackeray wrote a letter to governor bhagat singh koshyari on hindutva and temple reopening)

राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनही उत्तर देणारं पत्र पाठवलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावरून भाजपचा अप्रत्यक्षरित्या खरपूस समाचार घेतला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आपल्या पत्रात मुख्यमंत्री लिहितात की,...

जय महाराष्ट्र, 

महोदय, आपलं १२ आॅक्टोबर २०२० रोजी इंग्रजीमध्ये पाठवलेलं प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतचं पत्र मिळालं. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना, त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लाॅकडाऊन करणं चुकीचं तसंच तो एकदम उठवणंही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणं हे अंगवळणी पडावं म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणं, जनजागृती करणं, आरोग्य तपासणी करणं, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणं हे सर्व आपल्या राज्यातील डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिलं राज्य असेल.

हेही वाचा - ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, भाजपचं आंदोलन

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का?

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरं-वाईट काय घडत आहे, ते बघता माझ्या महाराष्ट्रात चांगलं कसं करता येईल, ते करण्याचा प्रामाणिकपणा मी करत आहे.

आपण म्हणता गेल्या ३ महिन्यांत काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळं उघडण्याबद्दल विनंती केली आहे. त्यातील ३ पत्रं आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो. आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, ही खात्री मी आपल्याला देतो. 

असं उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा - सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा