टिळक भवन येथील काँग्रेस मुख्यालयात सलग ३ दिवस झालेल्या आढावा बैठकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सज्ज असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी टिळक भवन इथं बैठका झाल्या. या बैठकांमध्ये राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यांत मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभाग यांचा समावेश होता. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली, असं चव्हाण म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असून जनतेच्या पाठिंब्यावर काँग्रेस भाजपाचा पराभव करून सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-
मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील
उद्धव, मुख्यमंत्री यांची महापौर बंगल्यात भेट