मुंबईतील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत रुग्णांची सख्या ८५७ च्या घरात पोहोचली आहे. गुरुवारी धारावीत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा हा तिसरा बळी आहे. धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा १४ झाला आहे. त्यामुळे धारावीत कोरोना झपाट्यानं पसरत असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनव्हायरसचा प्रसार पाहता महाराष्ट्र सरकार क्वारंटाईन सेंटर उभारण्यावर अधिक भर देत आहे. तत्पूर्वी, मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियानं (एनएससीआय) आपलं मैदान क्वारंटाईन रुग्णांसाठी दिलं आहे. COVID 19 च्या रुग्णांसाठी सरकारनं रेल्वे कोच वापरण्यास सुरुवात केली आहे.
आता लवकरच सरकार क्वारंटाईन करण्यासाठी शाळांचा वापर करणार आहेत. मुंबई लाइव्हशी खास बातचीत करताना महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागांच्या यादीमध्ये शाळा समाविष्ट करण्याचा विचार करीत आहे. यासोबतच चाचणीचे निकाल जलद गतीनं लागावेत यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
“महाराष्ट्रातील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे की, सरकारी आणि खासगी शाळांचा उपयोग क्वारंटाईन सुविधा म्हणून करण्यात यावा. यामुळे क्वारंटाईन ठेवण्यासाठी आपल्या अधिक जागा उपलब्ध होतील,” असं राजेश टोपे म्हणाले.
धारावीसारख्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व सांगतांना टोपे म्हणाले की, कोरोनायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता महत्त्वपूर्ण असल्यानं वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे.
“लोकांनी स्वच्छ शौचालयांचा वापर केला पाहिजे, जंतुनाशक वापरली पाहिजेत. जलद गतीनं स्वच्छता व्हावी यासाठी आम्ही अग्निशमन विभागाची मदत घेत आहोत. यासह आम्ही गरजूंसाठी जेवणाचीही व्यवस्था करीत आहोत, ”असं टोपे म्हणाले.
कोरोनाव्हायरसच्या चाचणी सुविधेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं सांगताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, चाचणीतही वाढ करण्याची गरज आहे.
“स्वॅब टेस्टचा निकाल २४ तासांच्या आत आला पाहिजे. परंतु ३ दिवसानंतरही हा अहवाल येतो. म्हणूनच आम्हाला चाचणी सुविधेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना बोलले आहोत.”
शिवाय टोपे म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या प्रसारात लोकांनी सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय अत्यावश्यक सामानासाठी बाहेर पडाव लागलं तर मास्क घालणं बंधनकारक आहे. जर मास्क नसलेलं आढळलं तर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना आहेत.
यापूर्वी, राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले होते की, दाट लोकसंख्या असलेल्या भागात लॉकडाऊन काटेकोरपणे पाळलं गेलं पाहिजे. हे आवाहन करताना महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात दाखल झाला नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Minister of Public Health and Family Welfare, Maharashtra talks about the efforts being made in #Dharavi to combat #coronavirus. Quarantine facilities are being prepped.
Posted by Mumbai Live on Thursday, April 9, 2020
हेही वाचा