राज्यातील गावपातळीवरील कृषी कामे होत नसल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून होत असल्याने राज्यात कृषी विभागात मेगा भरती करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्य प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण ७२ हजार रिक्त जागा २ टप्प्यात भरण्यात येतील, अशी माहिती दिली होती.
त्यापैकी पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच पुढच्या वर्षी ३६ हजार पदांची करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा बळकट होणार असून युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-
डाॅक्टर, वकील, इंजिनीअर धावताहेत पोलिस काॅन्स्टेबल होण्यासाठी!
१०६ हुताम्यांच्या नातेवाईकांना नोकरी, घर द्याच!