Advertisement

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल– अजित पवार

पाणी ओसरेल तसं पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल– अजित पवार
SHARES

‘पुराचं संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल,’अशी ग्वाही देऊन पाणी ओसरेल तसं पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत येथील राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

शिरोली व किणीजवळ पुराचं पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग (एनएच ४) बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५, २०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करुन महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत जाहीर

दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती, राडारोडा साचून नदीपात्रात गाळ साचला असल्यास नदीचा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. याबरोबरच नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊ नये, यासाठी नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नका, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने करा. काही रस्त्यांवर ब्रिटीशकालीन मोऱ्या आहेत. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने यापुढे ब्लॉक पद्धतीने किंवा स्लॅब टाकून रस्त्यांची बांधणी करा. पूरग्रस्तांसाठी मदतकार्याबरोबरच या भागातील साफसफाई करुन घ्यावी तसंच मोफत अन्नधान्य वितरणावर लक्ष द्यावं. पूरग्रस्त भागासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अत्याधुनिक बोटी घ्या, सब मर्शिबल पंप, सक्शन यंत्र व अन्य यंत्रसामग्री घेण्यासाठी शासन मदत करेल, असं सांगितलं.

पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी गावातील उंच ठिकाणच्या गायरान जमिनींची निवड करावी. यासाठी संबंधित गावाने ग्रामसभा घेऊन निर्णय घेणं आवश्यक आहे.

पूर परिस्थितीमुळे झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख, केंद्र शासनाकडून २ लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून २ लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना केल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा