महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला राजकारणात पुढं जाताच येत नाही. मग तो पक्ष सत्ताधारी असो वा विरोधक. त्यानुसार केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारकडून फुले-आंबेडकर या महामानवांचं नाव नेहमीच घेतलं जातं. त्यांच्याच विचारांचे दाखले सातत्याने सरकारकडून दिले जातात. पण याच फुले-आंबेडकरांचा विसर सरकारला पडला आहे.
राज्य सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या दिनदर्शिकेत महात्मा फुले आणि डाॅ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर हा महापुरूषांचा अवमान असल्याचं म्हणत संबंधितांविरोधात कारवाईची मागणीही मुंडे यांनी केली आहे.
सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार महामानवांचा अवमान होत आहे.माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही.या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 5, 2019
दरवर्षी माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. या दिनदर्शिकेचं वाटप राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांत आणि विभागात केलं जातं. त्यानुसार यंदाही २०१९ ची दिनदर्शिका सरकारकडून प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेत सर्व महत्त्वाच्या दिवसांची नोंद आहे. मात्र त्याचवेळी फुले आणि आंबेडकर यांच्या पुण्यतिथीची नोंद यात नाही. फुले यांची पुण्यतिथी २८ नोव्हेंबरला असते. मात्र नोव्हेंबर २०१९ मध्ये पुण्यतिथीची नोंदच नाही.
६ डिसेंबर, डाॅ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन तर कुणीही विसरू शकतं नाही. ६ डिसेंबरला डाॅ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकर अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. असं असताना दिनदर्शिका छापताना मात्र याच महत्त्वाच्या तारखेचा विसर पडला आहे. सरकारच्या या निष्काळजीपणाचा आता सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने तर महामानवांच्या स्मृती या सरकारला पुसून काढायच्या आहेत का असा सवाल करत भाजपावर हल्ला चढवला आहे.
रिपब्लिकन सेनेनेही सरकारचा निषेध केला असून त्वरीत या दिनदर्शिकेचं वितरण थांबावं. वितरीत करण्यात आलेल्या दिनदर्शिका त्वरीत परत मागवून घ्याव्यात आणि नव्यानं महापुरूषांच्या पुण्यतिथीचा उल्लेख असलेल्या दिनदिर्शिका छापून घ्याव्यात. तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे इतकी मोठी चुक झाली आहे त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून सर्व खर्च कापून घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा -
मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी आमदार इम्तियाज जलिल न्यायालयात