Advertisement

ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकलेल्यांवर कारवाई होणारच- अनिल देशमुख

नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल, असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुद्द्यावरून सरकारला घेणाऱ्यांना चपराक लगावली.

ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकलेल्यांवर कारवाई होणारच- अनिल देशमुख
SHARES

बॉलिवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचं उघड होत असून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलिवूड ड्रग रॅकेटमध्ये अडकल्याचं म्हणणं योग्य ठरणार नाही. बॉलिवूडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल, असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुद्द्यावरून सरकारला घेणाऱ्यांना चपराक लगावली. (maharashtra home minister anil deshmukh reacts on bollywood drug connection TRP scam and politics)

देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचं केंद्र असणाऱ्या मुंबईवर चिखलफेक सुरु झाली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या मुंबईतल्या बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांचे यामागचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मुठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. बॉलिवूडमधील काही घटक ड्रगच्या आहारी गेल्याच्या संबंधाने चौकशी चालू आहे. बॉलिवूडमधील अपप्रवृत्तींचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलीस भल्या-बुऱ्यातील फरक ओळखून वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

कारस्थान उधळणार

बॉलिवूडशी संबंधित नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातल्या हजारो फेक अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे एव्हाना उघड झालं आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता मुंबई-बॉलिवूडला लक्ष्य केल्याचं दिसत आहे. मात्र त्यांचे हे कारस्थान उधळून लावण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. बॉलिवूडसह देशातल्या सर्वच सिनेसृष्टीने मुंबईवरील प्रेम आणि विश्वास पूर्वीसारखाच अभेद्य ठेवावा. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा मंत्री अनिल देशमुख यांनी दिला. गुन्हा घडून गेल्यानंतर अवतरणारे पोलिस फक्त सिनेमांमध्येच असतात. महाराष्ट्राचे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलिवूडला बदनाम करु पाहणाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा- ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांना फास आवळला

बाॅलिवूडला हलवण्याचा प्रयत्न

बॉलिवूडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचं दिसते आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हेच कर्तृत्त्ववान मराठी माणूस आहेत. फाळके यांनी सन १९१३ मध्ये ‘राजा हरिश्र्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बीजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (१९३१) मुंबईतचं झळकला. शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कोणी, कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही, असं अनिल देशमुख यांनी बजावून सांगितलं.

मुंबईलाच पसंती

चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चित्रपट व्यवसायाला महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळणारं अपार प्रेम आणि आदर तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाला मिळणारे संरक्षण यामुळे चित्रपटसृष्टीने मुंबईत भक्कमपणे पाय रोवले आहेत. बॉलीवूडमधल्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टीस्ट यासारख्या हजारो कुटुंबांचा चरितार्थ आज अवलंबून आहे. कितीही संकटं आली तरी मुंबईला असणारे ग्लॅमर, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षितता यामुळे बॉलिवूडने मुंबईला नेहमीच पसंती दिली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस दलावर बॉलिवूडचाच नव्हे तर तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी येथील चित्रपट व्यावसायिकांचाही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत राहतात. याचेच दुखणे काहींच्या पोटात असू शकते. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहीम आज चालवली जात आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

वेळीच शहाणं व्हा

शेकडो सिने तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लाहोर-कराचीपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देशपातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. कारण या मुंबईने, या महाराष्ट्राने सर्वांचं खुल्या दिलाने स्वागत केलं. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचं असेल तर महाराष्ट्रातले पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचं स्वागतच करेल. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे बालिश प्रयत्न करणाऱ्यांनी वेळीच शहाणं व्हावं, असा सल्लाही अनिल देशमुख यांनी दिला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा