संपूर्ण कोरोनाच्या संकटात आपल्याच लोकांना त्रास देणारं राज्य देशात कुठलं असेल, तर ते महाराष्ट्र राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी जगभरातील विविध देशांचं उदाहरण दिलं. पण या देशांनी लोकांसाठी काय काम केलं हेही मुख्यमंत्र्यांनी आधी बघितलं पाहिजे होतं, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, कोविड का वाढतोय, तो महाराष्ट्रातच का वाढतोय, त्यावर आम्ही काय उपाययोजना करत आहोत. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगण्याची आवश्यकता होती. नागपूर, पुणे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोविड (covid19) रुग्णांची संख्या वाढल्याने बेड्स मिळत नाहीयत, त्यांना कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाहीय, यासंदर्भात काय करणार आहोत? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात, त्यांना उत्तर दे यामध्येच संपूर्ण वेळ वाया घालवला.
हेही वाचा- तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
If CM Uddhav Thackeray wants to compare Maharashtra pandemic situation with other nations just to impose another lockdown, then we also need to look on what those Governments have done for their citizens. pic.twitter.com/J8wb431IdP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 3, 2021
भाषण समजलंच नाही
मला समजलंच नाही की कालचं भाषण कशाकरीता होतं. त्यात काही उपाययोजनाही नव्हत्या. आता दोन दिवसांनी तुम्ही बघा, काय दोन दिवसांनी बघायचंय? विषय एवढाच आहे की लाॅकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागतं. त्याला कुणाचाही विरोध नाहीय. पण तो अपवाद आहे, तो नियम असू शकत नाही. ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाॅकडाऊन करताना प्रत्येक घटकाचा विचार केला. लोकांच्या घरी अन्नधान्य गेलं पाहिजे, त्यांच्या अकाऊंटला पैसे गेले पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा कार्यक्रम राबवला. असा कार्यक्रम आधी राबवा आणि त्यानंतर लाॅकडाऊनचा विचार करा, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.
लोकांना त्रास देण्यावरच भर
केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज महाराष्ट्रला दिलं आहे. देशातील इतर राज्यांनी देखील आपापल्या जनतेसाठी पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने (maharashtra) एक पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही, पण त्या ऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणं लोकांना त्रास देणं यावरच भर दिलेला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
(maharashtra opposition leader devendra fadnavis criticized cm uddhav thackeray over lockdown)