राज्यभरात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अधिक मतांनी विजयी होण्यासाठी मतदारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी अनेक समस्यांवर भाष्य करताना शिवसेना-भाजप युतीलाही लक्ष केलं. राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारसभेत 'शिवसेना युतीत सडली आणि १२४ जागांवर अडली' असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला. त्याशिवाय 'शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्षं सत्तेत सडली त्यांचीच युती आता १२४ जागांवर अडली. हया असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायचं असेल तर सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे' असही राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभेत म्हटलं.
शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची १२४ जागांवर अडली. ह्या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे #RajThackerayLive
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 10, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरूवारी सांताक्रूझ इथं पहिली प्रचारसभा झाली. या सभेत राज यांनी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी केली. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीला मी एक भूमीका घेऊन उतरलोय असंही त्यांनी म्हटलं ही भूमीका म्हणजे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्यायची, असं राज ठाकरे यांनी या सभेत म्हटलं. त्यानंतर गोरेगाव इथं झालेल्या दुसऱ्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर जोरदर टीका केली.
विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे ह्यावर सगळं अवलंबून आहे. #RajThackerayLive
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 10, 2019
'बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेत कधीही नेते आयात करावे लागले नाहीत', असा टोला त्यांनी लगावला. तसचं, 'एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या', अशी मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून केली. 'सत्ताधारी जर मनमानी करत असतील तर त्यांना जाब विचारण्यासाठी सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष हवाच. ती भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या पद्धतीनं पार पाडेल', असा विश्वास व्यक्त करत राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असं आवाहन उपस्थितांना केलं.
हेही वाचा -
रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र
संतप्त PMC बँक खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव, सीतारमण यांनी दिलं 'हे' आश्वासन