अाझाद मैदानावर मागील १० दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांनी मागे घेतलं अाहे. मराठा समाजाला १६ टक्के अारक्षण देण्याची घोषणा केल्यानंतरही मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांच उपोषण सुरू होतं. गुरूवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अाझाद मैदानावर जाऊन अांदोलनकर्त्यांची भेट घेतली. अारक्षण कोर्टात नक्की टिकेल, मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं अाश्वासन यावेळी उद्धव यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात अालं.
मराठा आरक्षणासंबंधीचा एटीआर (अॅक्शन टेकन रिपोर्ट) अर्थात कृती अहवाल गुरुवारी विधीमंडळात सादर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचं विधेयक पटलावर सादर केलं. विधेयक सादर करताच कुठल्याही चर्चेविना हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं राज्यभरातील मराठा समाजाच्या जल्लोषाला उधाण आलं आहे. मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते ठिकठिकाणी मिठाई वाटून आनंद सादर करत आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गुरुवारी दोन्ही सभागृहात एटीआर सादर करत आरक्षणाचं विधेयक आणलं जाणार आहे. तर हे विधेयक मंजूर करत मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
मराठा संघटना ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्या आणि तेही न्यायालयात टिकेल असं आरक्षण द्या यावर ठाम आहे. तर सरकार सर्वांचीच दिशाभूल करत असून ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचं म्हणत ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
विरोधक अहवाल सादर करण्यावर ठाम आहेत. त्यामुळं या सर्व आव्हानांना पार करत आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेण्याची कसोटी गुरुवारी सरकारला पार करावी लागेल.
गुरुवारी कृती अहवाल सादर करत विधेयक मंजूर करून घ्यावं लागणार आहे. असं असताना अधिवेशनासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी वेळ कमी पडला तर अधिवेशनाची वेळ वाढवून घेऊ, असे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. वेळ वाढवू पण विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.