मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर पुन्हा एकदा चांगलंच तोंडसुख घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे आणि या विभागाचे सचिव विनिता वेद सिंघल या दोघांना अभय दिलं असल्याचा आरोप त्यांनी केला. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लाचलुचपत विभागाने संबधित मंत्री, सचिव, अधिकारी आणि कंत्राटदार यांना चौकशीसाठी बोलावले नाही, त्यांच्याकडून शपथपत्र घेतले नाही, त्यांचे बँक खाते तपासले नाही. विनिता वेद सिंघल या 'टेक होम' रेशन योजनेमध्ये भ्रष्टाचारमध्ये अडकल्या होत्या. उच्च न्यायालयाने याबाबत ताशेरे ओढले आहेत, असे असूनही त्यांना या खात्यात घेतले गेले आहे. मनीषा वर्मा या चांगल्या अधिकाऱ्याला महिला आणि बाल कल्याण विभागामध्ये चार्ज घेण्यास मज्जाव करण्यात आला आणि विनिता वेद सिंघल भ्रष्ट अधिकाऱ्याला या विभागात घेण्यात आले, असेही आरोप त्यांनी या वेळी केलेत.