मराठा समाजाला आरक्षण देण्याची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करत आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात येईल. त्यामुळे १ डिसेंबरला मराठा बांधवांनी जल्लोषाची तयारी करावी, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी. पण अद्याप आरक्षणाचा मुद्दा निकाली लावण्याच्यादृष्टीनं कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्वच बाबतीत संभ्रमावस्था आहे.
मग येत्या ५-६ दिवसांत आरक्षण कसं मिळणार? असा सवाल करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारला ३० नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर १ डिसेंबरला राज्यभर मराठा बांधवांचा आक्रोश दिसेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणावर सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करण्यासाठी गुरूवारी मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ही बैठक गुरूवारी होऊ न शकल्याने ही बैठक आता २७ नोव्हेंबरला होणार असल्याचंही आबा पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठीच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी सरकाराने स्वीकारल्या असून सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. पण प्रत्यक्षात आरक्षण कधी आणि कसं मिळणार याबाबत मात्र सरकारकडून काहीही स्पष्टपणे सांगितलं जात नाही. विरोधकांचीही भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळं मराठा समाजही संभ्रमात आहे, असं म्हणत आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला आहे.
गुरूवारी रात्री उशीरा सरकारकडून उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा कामकाजाला ३ दिवस सलग सुट्टया आहेत. त्यामुळं पुढील ५-६ दिवसांत ही उपसमिती काय आणि कसा निर्णय घेणार? हाच मोठा प्रश्न असल्याचं आबा पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच १ डिसेंबरला जल्लोष नव्हे, तर मराठा समाजाचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना राज्यभर दिसेल, असा इशाराही आबा पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा-
मराठा आरक्षण: १ डिसेंबरला जल्लोष करा - मुख्यमंत्री
अहवाल नव्हे शिफारशी स्वीकारल्या जातात-मुख्यमंत्री