''नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग धुतल्याशिवाय मी राहणार नाही'', अशा शेलक्या शब्दांत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खासदार राणे यांच्यावर टीका केली होती. यावर ''रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेला कुत्रा आहे'', असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी कदमांवर तीखट शब्दांत प्रतिहल्ला चढवला आहे.
रत्नागिरी इथं शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राणेंवर शरसंधान साधताना कदम म्हणाले की, ''राणेंनी शिवसेना सोडल्यापासून किती पक्ष बदलले. आधी ते काँग्रेसमध्ये गेले तिथून ते भाजपात आलेत. त्यांच्यासाठी आता केवळ रामदास आठवले यांचाच पक्ष शिल्लक राहिलाय. राणे जेव्हा तेव्हा मातोश्रीवर टीका करत असतात. पण त्यांची तेवढी औकात नाही. राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी शिवसेनेच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती जमवली. राणेंसारख्या व्यक्तीला सूर्याजी पिसाळाच्या अवलादीची उपमा देणंही कमी ठरंल. नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही.''
स्व.मान बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..
— nitesh rane (@NiteshNRane) December 14, 2018
उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे..
रामदास कदम च्या रुपत!!
सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..
भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!
या टीकेनंतर खवळून उठलेले राणे यांचे सुपूत्र आ. नितेश राणे यांनी कदम यांची ट्विटरवरून चांगलीच खरडपट्टी काढली. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे लिहितात की, '' दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनाही कुत्रे पाळायची हौस आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तीच परंपरा सुरू ठेवली आहे, ती रामदास कदम यांच्या रुपात. ते सतत भुंकत असतात, हे त्यांना माहिती नाही. परंतु भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत.''
नितेश यांच्या या झोंबणाऱ्या टीकेनंतर आता कदम यावर काय प्रतिक्रीया देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा-
'मल्ल्याला चोर म्हणणं चुकीचं' या वक्तव्यानंतर गडकरींनी कशी केली सारवासारव?
निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस