मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, रायगड आणि कोकणात पूरस्थिती निर्माण झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या बचावकार्यात असंख्य अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मनसैनिकांना पुराच्या संकटात अडकलेल्यांना जमेल तितकी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन करतो. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथं पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थात स्वत:ची काळजीही घ्यावी.
महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा- रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाचा इशारा
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन... pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून मी महाराष्ट्रातील (maharashtra) स्थितीचा आढावा घेत आहे. ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तिथं बचावकार्य आणि मदतकार्य सुरु आहे. मात्र आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. कारण अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहे. हे अनपेक्षित असं संकट आहे. दरडी कोसळत आहेत, पुराचं पाणी वाढत आहे. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. पुढचे दोन ते तीन दिवस संकट अजूनही कायम राहील.
तळई इथं दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवता आलं. पण ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कर, हवाई दल, नेव्ही. एनडीआरएफ बचावकार्यात उतरले असून सर्वोपतरी मदत केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav tackeray) यांनी दिली.