महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी राज यांनी भेट दिली. या भेटीत दोघांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीत प्रामुख्याने महाआघाडीविषयी चर्चा झाल्याचं समजत आहे.
राज यांच्या भाषणाने यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. खासकरून त्यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा डायलाॅग खूप फेमस झाला. निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज यांनी आपल्या प्रत्येक भाषणातून अमित शहा आणि मोदीमुक्त भारत करण्याचं मतदारांना आवाहन केलं. परंतु त्यांच्या भाषणाचं मतपरिवर्तन होऊ शकलं नाही. किंबहुना त्यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्यापैकी एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही.
असं असलं तरी राष्ट्रवादीच्या पुढाकाराने मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा जोरदार प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास नकार दिला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला टक्कर द्यायची असल्यास सर्वांना एकत्रित यावं लागेल, असं सर्वच नेत्यांना वाटत आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरू शकेल.
याआधी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली होती.
हेही वाचा-
निवडणूक लढवायला हिंमत लागते, नीलेश राणेंची आदित्यवर टीका
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून