युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर निवडणूक लढवायला हिंमत लागते. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. परंतु दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे केवळ तिकीट वाटपच करू शकतात, अशा शब्दांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नेते नीलेश राणे यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीने राज्यातील ४८ जागांपैकी ४१ जागा जिंकल्याने विधानसभा निवडणुकीतही याच यशाची पुनरावृत्ती होणार, असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. याच विजयी लाटेवर स्वार होत शिवसेनेचे युवानेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक लढवायला हिम्मत लागते... विजय किव्हा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे हिजड्यांसारखे फक्त टिकिट वाटप करू शकतात. https://t.co/N0LeVKuaR2
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 28, 2019
युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत ‘हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय.’ अशा शब्दांत आदित्य यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे. सोबत त्यांचा फोटो टाकत त्यांना टॅगही केलं. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी तसंच इतर नेत्यांनीही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास आपल्याला नक्कीच आवडेल, असं मत व्यक्त केलं.
यावरून पुन्हा एकदा आदित्य निवडणूक लढवणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली. याआधीही आदित्य लोकसभा निवडणूक लढवणार असं म्हटलं जात होतं. परंतु ही चर्चा खुद्द आदित्य यांनीच फेटाळून लावली. शिवसेनेची सगळी सूत्रे ही मातोश्रीवरून हलवली जातात. असं असलं तरी, शिवसेनेची स्थापना करणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने आतापर्यंत निवडणूक लढवलेली नाही. हाच धागा पकडून नीलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर अक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे.