मुंबईतील दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क मैदानात विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्कातील गणेश उद्यान, शिवाजी महाराजांचे स्मारक यांना विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, विद्युत रोषणाईवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) शिवसेना प्रश्न विचारला आहे. या विद्युत रोषणाईसाठी 'सव्वा कोटी रुपये खर्चून इटलीहून दिवे आयात करण्याची गरजच काय होती? असा सवाल मनसेचे सरचिटणीस व या विभागातील माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
मनसेचे सरचिटणीस व या विभागातील माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'सव्वा कोटी रुपये खर्चून इटलीहून दिवे आयात करण्याची गरजच काय होती? हे दिवे भारतात बनू शकत नाहीत का? या दिव्यात असं काय आहे की ते बाहेरूनच आयात करावे लागले? जो देश अत्याधुनिक मिसाइल बनवतो, मंगळावर यान पाठवतो तो दिवे बनवू शकत नाही का? माझा तर विश्वासच बसत नाही. मग हा निर्णय का घेण्यात आला? हा योगायोग आहे की इटलीचे लांगूलचालन?,' अशी प्रश्नांची सरबत्तीच देशपांडे यांनी केली आहे.
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 19, 2021
'महापालिकेनं प्रसिद्धी पत्रक काढून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार दिव्यांसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात ५ वर्षांचा देखभाल खर्च समाविष्ट आहे. हे दिवे कायमस्वरूपी राहतील का, माहीत नाही. पण परदेशी कंपनीकडून आयात केले नसते तर सव्वा कोटी रुपयांचा खर्च दाखवताच आला नसता,' असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. 'इटलीबद्दलचं यांचं प्रेम अचानक कसं उफाळून आलं, याचं उत्तर शिवसेनेनं द्यावं,' असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुशोभिकरण व सौंदर्यीकरणाची काम सुरूच असतात. अलीकडंच इथं विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी खास इटलीहून दिवे आयात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना व काँग्रेसचे सूर जुळू लागले आहेत. त्यामुळं विरोधकांकडून शिवसेनेवर अनेकदा 'सोनिया सेना' अशी टीका होत असते. संदीप देशपांडे यांच्या ट्वीटचा रोखही तोच असल्याचं बोललं जात आहे.