रस्त्यांवरील खड्डे, मराठी पाट्या, फेरीवाले, मल्टिप्लेक्समधील खाणं-पिणं असो वा इतर कोणत्याही विषयावरील मनसेचं आंदोलन म्हटलं की खळखट्याक आणि राडा आलाच. पण या सगळ्यांना फाटा देत मनसेनं सोमवारी ठाण्यात अगदी शांततेत महामोर्चा काढला. भाजपा-शिवसेना सरकारविरोधात काढण्यात आलेल्या या महामोर्चाला मनसे कार्यकर्त्यांनी-महिलांनी प्रचंड गर्दी केली. हा मोर्चा इतका विराट होता की त्यामुळं तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या वाहतूक व्यवस्था कोडमडून पडली. मनसेकडून पहिल्यांदाच ठाण्यात शांततेत विराट मोर्चा काढण्यात आल्याने मोर्चाची चर्चा सर्वत्र होती.
गेल्या ४ वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला केवळ आश्वासनचं दिली. प्रत्यक्षात जनतेच्या हाती काहीच लागलं नाही. सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्न 'जैसे थे' आहेत. त्यामुळेच मूळ प्रश्नांना बगल देत मंदिर, मस्जिद आणि देशप्रेमाचा मुद्दा पुढं करत भाजपा सत्तेची पोळी भाजून घेत असल्याचं म्हणत मनसेने सोमवारच्या महामोर्चाची हाक दिली होती.
त्यानुसार दुपारी १ च्या सुमारास ठाण्यातील तीन हात नाका इथून मनसेच्या महामोर्चाला सुरूवात झाली. ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते सहभागी झाले. यात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
ठाण्यातील प्रवेशद्वारावरील टोल, विविध प्रकल्पांसाठी ठाण्यातील शेतजमिनीच संपादन, कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांच्या नगरपालिकेचे खोटे आश्वासन, ६५ कोटींच्या पँकेजच गाजर, दिवा क्षेपणभूमी बंद करण्याचं आश्वासन, क्लस्टर योजनेतून फसवणूक, ३ वर्षांपासून रखडलेला कोपरीचा पूल, भिवंडी येथील वीज ग्राहकांची लूट असे अनेक विषय घेत मनसेकडून हा महामोर्चा काढणअयात आला.
ठाणेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आला. या प्रश्नांसंबंधीचं निवेदन अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
हेही वाचा-
व्यंगचित्रातूनच भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्ली
आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला