नरिमन पॉइंट - नोटबंदीवरून आता माजी गृहमंत्री आणि काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंंदे यांनीही मोदीसरकारव टीका केली आहे. नोटबंदीनंतर किती काळा पैसा जमा झाला हे सरकार किंवा रिझर्व बँक अजूनही जाहीर करत नाहीत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होतोय. 50 दिवस त्रास सहन करा नंतर त्रास कमी नाही झाला तर कुठल्याही चौकात फाशी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. त्यामुळे त्यांना कुठे शिक्षा द्यायची महाराष्ट्रात, गुजरातमध्ये की कर्नाटकात याचा विचार करत असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले.
काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीची पहिली बैठक शनिवारी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जनतेला होत असलेल्या त्रासाविरोधात काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. येत्या 9 जानेवारीला राज्यभर घंटानाद, थाळीनाद आंदोलन केलं जाणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितले.