जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी असं वाटतं तोपर्यंत मी निवडणूक लढवणार. आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी व्यक्त केला. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्दीमाध्यमांशी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चाचपणीच्या बैठकीत काही जणांनी उदयनराजे सोडून कोणीही चालेल, अशी भूमिका मांडली. फक्त आडवे करायचेच बाकी ठेवले. हा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा भाग आहे. पूर्वी राजेशाही होती. राजे कुटुंबातील जे लोक लोकांबरोबर राहिले त्यांना जनतेने भरभरून साथ दिली. जे राजे घराण्यात जन्मले पण जनतेत मिसळले नाहीत, लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मी प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. ही लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती आहे.
ज्याला कोणाला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून येणार याची खात्री वाटते, त्यांनी मतांचा आकडा सांगावा. मी स्वतः त्याचा प्रचार करेन. आमदार, मंत्री, खासदार सर्व पदे भूषविली आहेत. त्यामुळे निवडणूक लढवली पाहिजेच असा माझा आग्रह नाही. पण, लोकांचा आग्रह असला तर मी निवडणूक लढवणार, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध कामांसाठी मी मंत्रालयात अनेक मंत्र्यांची भेट घेतली. पूर्वीच्या सरकारकडूनही कामे होत होती. या सरकारकडूनही कामे होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण, जात ही संकल्पना मला कधीच पटली नाही. जातीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. कधीतरी याचा विचार करावाच लागेल, असंही उदयनराजे म्हणाले.
हेही वाचा -
प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू; आदित्य ठाकरेंचा निरूपम यांना टोला
राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार?