केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचं नियोजन बिघडलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सोबतच जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल तर जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत? असा प्रश्न देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये नवाब मलिक (nawab malik) म्हणतात, केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचं नियोजन बिघडलं आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडेचार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत.
जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पार पाडण्याची क्षमता व नियोजन नसेल तर जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत? आज साडेचार लाख लोकांना दुसरा डोस मिळत नाही. १८-४४ वयोगटातील लोकांसाठी लस उपलब्ध नाही. तरीही एकामागून एक निर्णय जाहीर करण्याची घाई केंद्राला लागली आहे.
हेही वाचा- लसींसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं, रोहित पवारांचा विरोधकांना सल्ला
केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडे चार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत - ना. @nawabmalikncp @PMOIndia #CoronavirusIndia pic.twitter.com/g1agwcMtIZ
— NCP (@NCPspeaks) May 10, 2021
यावर उपाय शोधण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय टास्क फोर्सची स्थापना करुन त्यासाठी एक नेता निवडला गेला पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
देशातील कोरोनाची (coronavirus) परिस्थिती लक्षात घेता मागील १४-१५ महिन्यांत केंद्र सरकारने त्या त्या वेळी आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. निर्णय घेताना योग्य ते निर्णय घेतले गेले नाहीत. मागील वर्षी मार्च महिन्यात रुग्णसंख्या कमी असताना तीन ते चार महिन्यांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला, मात्र सध्या दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण आढळत असताना लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली जात आहे.
देशपातळीवर रोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अशावेळी राज्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. केंद्र सरकारने काहीतरी ठोस असा राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा, तरच कोरोना महामारी नियंत्रित होऊ शकेल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
(nawab malik criticized central government for covid 19 vaccine shortage)