महाविकास आघाडीचं सरकार नुसती ५ वर्षेच नाही, तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भविष्यातही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (shiv sena- ncp) आघाडी कायम राहण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शरद पवार यांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, आज एका वेगळ्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं आहे. कधी कुणाला पटलं नसतं की सेना आणि आपण एकत्र काम करू शकू. पण आपण ते केलं. पर्याय दिला आणि सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला.
तिन्ही पक्षाच्या लोकांनी या पर्यायाच्या बांधिलकीतून योग्य रितीने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि परिणामस्वरूप हे आघाडी सरकार उत्तम रितीने काम करतंय... कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि ५ वर्षे काम करेल.
हेही वाचा- मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वैशिष्ट्य राहिले की तुमच्या साऱ्यांच्या कष्टाने आणि जनतेच्या बांधीलकीने आज आपण २२ वर्षे आणि दिवसेंदिवस जनमानसात आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झालो.#NCP22 #NCPFoundationDay pic.twitter.com/YJL3wLEPAM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 10, 2021
नुसती ५ वर्षेच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास शरद पवार (sharad pawar) यांनी यावेळी व्यक्त केला.
टोपेंचं कौतुक
या सर्व संकटाच्या कालखंडात आपण थांबलो नाही, डगमगलो नाही. आपण कोरोनाला सामोरे गेलो. शेवटच्या माणसापर्यंत अन्नधान्य पोहचेल याची आपण खबरदारी घेतली. सरकारचे कार्यक्रम राबवण्यात आपण सगळे यशस्वी झालो. म्हणूनच मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही.
कोरोना संकटात देशाचं एकंदरित चित्र पाहिलं तर अधिक गंभीर स्थिती महाराष्ट्रात होती. तिचा सामना करण्यासाठी व लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी आरोग्य खात्याने राजेश टोपेंच्या नेतृत्वात जे काम केले त्यातून आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, हा विश्वास सामान्य लोकांमध्ये तयार झाला, असं म्हणत शरद पवार यांनी राजेश टोपे (rajesh tope) यांच्या कामाचं कौतुक केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (ncp) समाजातील उपेक्षित घटकांच्या केवळ पाठीशी उभा राहातो असं नाही तर त्यांच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्द करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो, या वर्गात नेतृत्वाची फळी तयार करतो, हे चित्र आपण निर्माण करणं आवश्यक आहे. त्यातूनच संबंध देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
(ncp chief sharad pawar hints future alliance with shiv sena)